२०० क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वाटप; आमदार विनोद अग्रवालांचा पुढाकार
गोंदिया, २९ जुलै-
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या निर्देशानुसार २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत राज्यभर विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. त्याअंतर्गत गोंदिया तालुक्यात प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत २०० क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी पुढाकार घेतला. जिल्हा परिषद गोंदियाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या माध्यमातून लाभार्थी क्षयरुग्णांची निवड करून त्यांना फूड बास्केटचे वितरण करण्यात आले.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या विशेष अभियानात विविध आरोग्य तपासण्या, ग्रामपंचायत स्तरावरील जनजागृती तसेच प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत ‘निक्षय मित्र’ उपक्रमावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांनी समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन ‘निक्षय मित्र’ बनावे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी फूड बास्केट उपलब्ध करून देऊन टीबीमुक्त भारत अभियानाला बळकटी द्यावी, असे आवाहन केले.
